आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध | Atmhatya Kelelya Shetkryachya Patniche Manogat Essay In Marathi

Atmhatya Kelelya Shetkryachya Patniche Manogat Nibandh In Marathi: भारत कृषी प्रधान देश असूनही शेतकऱ्यांची अवस्था कधी कधी अत्यंत दयनीय होते. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पिकांना योग्य भाव न मिळणे, कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत त्याच्या पत्नीला सर्वात जास्त वेदना आणि संघर्षाला सामोरे जावे लागते. पती गमावल्यानंतर ती एकटीच राहते आणि कुटुंब सांभाळण्याची जबाबदारीही तिच्या खांद्यावर येते. या लेख मध्ये आपण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये केलेले आहे.

Atmhatya Kelelya Shetkryachya Patniche Manogat Essay In Marathi

[ मुद्दे : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचा बोलण्याचा प्रसंगपती गेल्याने आलेले संकट-सरकारी मदत न पोहोचणे-काहीतरी काम मिळण्याची अपेक्षा-पतीचा आधार होता-निसर्गाचा लहरीपणा-शेती निष्फळ घरातील अडचणी-सावकाराकडून कर्ज-सावकाराचा तगादा-आत्महत्या समारोप.]

ती पूर्ण भांबावलेली होती. कुठे उभे राहावे? कसे उभे राहावे? काय बोलावे? तिला काहीही सुचत नव्हते. समोरचा कोणीही सूचना करी, त्याप्रमाणे ती कृती करी. टीव्ही वाहिन्यावाल्यांनी आपले माईकचे दंडुके समोर धरले होते. दारिद्र्य, कुपोषण, रापलेपण तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

तिच्या शब्दांत, उच्चारांत, हालचालींत संपूर्णपणे हताशपणा जाणवत होता. एका शेतकऱ्याची ती पत्नी. त्या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. टीव्हीवाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी सुचवल्यावर ती बोलू लागली…

“साहेब काय बोलू? नि काय सांगू? घरमालकांनी आपलं जीवन संपवलं आणि गेले… आम्हांला वाऱ्यावर सोडून! तेरावं होईपर्यंत शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आम्हांला जेऊ खाऊ घातलं. ती तरी आणखी किती घालतील? दोन मुलं पदरात आहेत.

कोणाकोणाकडे काहीबाही मागून मागून पोट भरतोय आम्ही. सरकारने एक लाख रुपये दिले होते. त्यातले तीस हजार एका साहेबानेच काढून घेतले. उरलेले सावकाराने घेतले.

आता सांगा आम्ही गरिबांनी जगायचं कसं? माझं काहीही लय मागणं नाही. आम्हां गरिबांना काम दया. मी कष्ट करीन. कष्ट करून मुलांना मोठं करीन.” तिने बोलता बोलता पदराचा बोळा तोंडात कोंबला.

हुंदका आवरला आणि पुढे बोलू लागली… “घरातल्या कर्त्या पुरुषाने स्वत:ला संपवलं. आता आम्ही काय करायचं? आणि करणार तरी काय? आभाळच फाटलं तिथं कुठं कुठं ठिगळ लावणार? म्हणजे पूर्वी फार सुखात होतो, असं नाही.

पण हे होते, तेव्हा निदान अर्धा घास तरी पोटात जायचा. आता मात्र अंधारच कोसळतोय अंगावर! “परंतु दिवसच फिरले. दोन-चार वर्षे धड पाऊसच झाला नाही. केलेली पेरणी फुकट गेली. पुन्हा पेरणी केली तर बियाणे खराब निघाले.

गत वर्षी पाऊस बरा झाला. कापूस मायंदळ आला; तर तो उचललाच गेला नाही. पैशाचे वांधे झाले. केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यात पोरगी मोठी झाली. गेल्या वर्षी तिचं लग्न करून दयावं लागलं. प्रत्येक कामाला पैका लागतो.

सरकारी बँकांचा तर उपयोग होतच नाही. मग गावातल्या सावकाराकडूनच उचल केली. परतफेड तर करणंच शक्य झालं नाही. दामदुप्पट व्याजामुळे कर्जाचे आकडे सतत फुगतच जात होते.

त्यातच घरातल्या म्हाताऱ्या माणसांचं आजारपण उभं राहिलं. अडचणी सारख्या वाढतच होत्या. मालक सारखे अस्वस्थ राहत. “या वर्षी मालकांनी खूप धावाधाव केली. अगदी मुंबईपर्यंत जाऊन आले. पण कुठूनही मदत मिळाली नाही.

सावकाराकडून पैशाचा तगादा चालूच होता. मदतीचा हात कुठूनही नव्हता. मालक दुःखात बुडालेले; गप गप असत. मग एक दिवस शेतावर गेले ते परतलेच नाहीत. स्वत:च लावलेल्या झाडावर गळफास लावून घेतला आणि जीवन संपवले!

“ते सुटले, पण आम्ही काय करायचे? माझी पोरं अजून लहान आहेत. त्यांना शिकवायचं आहे. शेत बळकावण्यासाठी गावातील सावकार उत्सुक आहे. सरकारकडून मिळालेल्या एक लाखातली एक दमडीही आम्हाला मिळाली नाही.

रोज एक वेळचंही जेवण नीट मिळत नाही. आम्ही वाटेल ते कष्ट करायला तयार आहोत. पण आम्हांला अन्न दया. गावातील इतर कुटुंबांचंही हेच दुखणं आहे. “आता सांगा, आम्ही काय करायचं? कसं जगायचं? आम्हांला जगू दया. या सावकारांपासून वाचवा. मला आत्महत्या करायची नाहीय. माझ्या मुलांसाठी तरी मला जगायचंय!”


निष्कर्ष

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची पत्नी ही विचित्र परिस्थितीतही आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी नायिका आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या समाजाचे वास्तव त्यांच्या वेदना आणि संघर्ष अधोरेखित करतात. अशा वेळी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे, जेणे करून भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि त्यांच्या पत्नींना या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. मी आशा करतो की तुम्हाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत निबंध/ Atmhatya Kelelya Shetkryachya Patniche Manogat Marathi Nibandh लेखन तुम्हाला नक्की आवडले असेल

Leave a Comment